श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय लष्कराने ठार केले. या घसुखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीममधील दहशतवादी आणि २ ते ३ पाकिस्तानी लष्कारी सैनिकांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूंछ जिल्ह्यातील कृष्णा व्हॅलीजवळ घडली.या पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय सैन्याच्या पुढच्या चौकीवर हल्ला करण्याची योजना होती. भारतीय सैन्याला याची माहिती मिळाली आणि त्यांनी आधीच हल्ला करून कट उधळून लावला. घुसखोरीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ७ जणांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचे (बॅट) ३ ते ४ सदस्यही ठार झाले आहेत. ही टीम सीमापार ऑपरेशन्समध्ये तरबेज असून या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे.या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी अल बद्र ग्रुपचे सदस्य आहेत. काही दिवसापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवू असे सांगितले होते. दरम्यान, आताही घुसखोरी केल्याचा प्रयत्न समोर आला आहे.