मुंबई : राज्य सरकारच्या गेम-चेंजर ‘मुख्यमंत्री लडकी बहीण योजने’संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. राज्यातील सुमारे ५ लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करीत उपरोक्त माहिती दिली. यासंदर्भातील आपल्या पोस्टमध्ये सुश्री तटकरे म्हणाल्या की, २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे. पुढे त्यांनी यापूर्वीच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळल्याचेदेखील सांगितले आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २ लाख ३० हजार. तसेच ज्यांचे वय ६५ वर्षांहून अधिक असलेल्या १ लाख १० हजार महिला. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १ लाख ६० हजार अशा एकूण ५ लाख अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच इतर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.