मुंबई : सकाळ, सायंकाळ अजानच्या नावाखाली मशिदीवरून मोठमोठ्याने भोंगे वाजवले जातात. हे भोंगे बंद करण्यात यावेत. मुंबई उच्च न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत या संदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून देणार का ? असा सवाल आज भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आदेशाची अंमलबजावणी करून त्याची जबाबदारी आता पोलीस निरीक्षकांवर टाकणार असल्याचे स्पष्ट केले.
आ. भातखळकर म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय २३ जानेवारी २०२५ रोजी आला आहे. जागो नेहरूनगर रेसिडेंस वेल्फेअर असो. आणि शिवसृष्टी सहकारी गृहनिर्माण सोसा. यांनी पिटीशन केली होती. या भागात अनेक मशिदींवर रात्रंदिवस भोंगे वाजतात. मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावले जातात, असे या पिटीशनमध्ये म्हटले आहे. यावर उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की ध्वनी प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई करावी. या निर्णयाचा उपयोग करत या सगळ्यावर कठोर कारवाई करणार का ? आणि याचा कालबद्ध कार्यक्रम आखून देणार का ? असे प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केले.
यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आ. भातखळकर यांनी सांगितले ते खरे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला निर्देश दिलेला आहे, त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. मुंबई पोलीस अधिनियमाच्या अंतर्गत त्यावर दंड आकारण्यात येईल. दंड भरला नाही तर जप्ती देखील करण्यात येईल, याशिवाय परवानगी घेतली आहे का नाही, परवानगी घेतली असेल आणि त्याचे उल्लंघन झाले असेल तर परवानगी रद्द करण्यात येईल. हे कोणत्याही परिस्थितीत काटेकोरपणे करणार असून त्याची जाबाबदारी पोलीस निरीक्षकावर टाकणार आहोत. जे आमदार भातखळकर यांनी सांगितले ते या पुढच्या काळात होताना दिसून येईल, असे फडणवीस म्हणाले.