रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र पुढील एक वर्षात उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा व तालुका महिला विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या विचारानेच रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच आम्ही लोकप्रतिनिधी आहोत हे आम्ही कधीही विसरणार नाही, असा विश्वास श्री. सामंत यांनी नी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून आपण सर्वांनी वागले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रत्नागिरीमध्ये देशातले सर्वांत चांगले बौद्ध विहार उत्पादन शुल्कच्या जागेवर उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला माजी आमदार बाळासाहेब माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष एल.व्ही. पवार, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सचिव दीपक जाधव यांसह भीमसैनिक, अनुयायी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.