महापालिकेचे नागरिकांना आवाहन
ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, व नळ सुरू ठेवून काम करणे टाळावे व पाण्याची बचत करावी असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
शक्यतो गाड्या धुवू नयेत त्या ऐवजी बोअरवेलच्या पाण्याने ओल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात. अंगणात शक्यतो पाणी मारु नये, नळ सुरू ठेवून कपडे धुणे, भांडी घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती दुरूस्त करावी. तसेच सोसायटीतील गळकी टाकी, पाईप, व्हॉल्व्ह दुरूस्त करावेत. इमारतीच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होणार याची दक्षता घ्यावी, अन्यथा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास अथवा तसे आढळून आल्यास संबंधीत इमारतीचे / सोसायटीचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येईल. शक्यतो रोज आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करु नये.
स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा. इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरु नये. पाण्याचा अनावश्यक साठा करु नये व साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी. इमारती/ सोसायटी/ संकुलांमधील तरण तलावास पिण्याचे पाणी वापरु नये व वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करुन एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत. कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे असे केल्यास पाण्याची बचत व मशीनचा पुर्ण क्षमतेने वापर होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुवून निर्माण होणारे निरुपयोगी पाणी साठवण करुन पुढचे दोन दिवस फ्लश, बाथरुम धुणे, फरशी पुसणे, गाड्या धुणे व बगीचा आदीसाठी वापरावे. ‘पाणी अनमोल आहे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा, पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय/ नासाडी टाळा’ असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.