पुणे : आज पुण्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डॉ. गोऱ्हे यांनी विविध योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले. “शिवसैनिकांनी आता सत्तेत असल्याचा फायदा घेऊन विकासाचे दूत म्हणून काम करावे,” असा ठाम संदेश डॉ. गोऱ्हे यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले की, “शिंदे सरकारने महिलांसाठी ‘आनंदाचा शिधा’, ‘लाडकी बहीण’ यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी अधिकाधिक जनजागृती करून लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे.”
मेळाव्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी सभासद नोंदणी मोहीम २५ ते २७ एप्रिल रोजी पुण्यातील लाल महाल, वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड आणि कसबा याठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवली जाणार असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमात नितीन पवार, बाळासाहेब मालुसरे, आनंद गोयल यांनी आयोजक म्हणून भूमिका बजावली. तर पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत (संपर्क प्रमुख), सुनील जाधव आणि युवा सेनेचे प्रमुख निलेश गिरमे, युवा सेना सचिव किरण साळी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आपल्या सत्तेत असूनही जर आपण निष्क्रिय राहिलो, तर जनतेचा विश्वास डळमळीत होईल. म्हणूनच आता आपण प्रत्येक प्रभागात सक्रिय राहून शिवसेनेच्या विचारसरणीचा प्रसार करायला हवा. जुने-नवे कार्यकर्ते एकत्र येऊन संघटनेला बळकट करावे.” त्यांनी ‘महायुती’तील समन्वय, आगामी निवडणुका, आरक्षण व्यवस्थापन, महिलांचा सहभाग, आणि कामगार-विद्यार्थी हिताच्या योजना यावरही ठामपणे आपली भूमिका मांडली. “आजचा मेळावा म्हणजे संघटनात्मक बळाचे प्रतीक आहे. शिवसेनेच्या पुढील वाटचालीत कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत जनतेचा विश्वास जिंकला पाहिजे,” असे उद्गार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवटी काढले.