सोलापूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. मंदिर समितीच्या निर्णयानुसार व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या सूचनेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिरात मोबाईल व कॅमेरासदृश वस्तूंना प्रवेश बंदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.