डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट

0

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांची साहित्य संमेलनातील फटकेबाजी त्यांना राजकीय फायदा करून देणार की खड्ड्यात घालणार हे काळच ठरवेल. दिल्ली येथील साहित्य संमेलनात एका परिसंवादात बोलताना नीलम ताई यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर खळबळ जनक आरोप केला. त्यामुळे साहित्य संमेलनापेक्षा नीलम ताईंचे आरोपाचीच चर्चा सुरू झाली. मातोश्रीवर दोन मर्सिडीज दिल्या की पदे मिळतात, अशा आशयाचा आरोप त्यांनी साहित्य संमेलनात केला. त्यामुळे या आरोपावरूनच चर्चा सुरू झाली.

खरे म्हणजे नीलम ताई गोरे यांना विधान परिषद ही केवळ शिवसेनेमुळे मिळाली. नीलम ताई यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. ईशान्य मुंबई मतदार संघातून त्यांनी त्यावेळी लाखभरापेक्षा जास्त मते मिळवली. चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात नीलम ताई यांचे मोठे सामाजिक काम होते. परंतु रिपब्लिकन पक्षात आपल्याला काही राजकीय पद मिळणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. तेथे ही त्यांची डाळ शिजली नाही. पुढे त्या शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेल्या. परंतु तेथेही आपल्याला काही राजकीय भवितव्य नाही हे लक्षात आल्याने त्यांनी आपला मोर्चा उजव्या विचारसरणीच्या शिवसेनेकडे वळवला. त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी दिवंगत पत्रकार हर्षद पाटील यांनी खूप मेहनत घेतली. केवळ त्यांच्यामुळेच नीलम ताईंचा शिवसेनेत प्रवेश झाला. २००० साली शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नीलम ताईंना अचानक २००२ साली उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद देण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या अनेक महिला शिवसैनिका आणि पदाधिकाऱ्यांना डावलून उद्धव ठाकरे यांनी नीलम ताई गोऱ्हे यांना विधान परिषदेत पाठवले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना चांगला धडा मिळाला आहे. नीलम ताई यांनी शिवसेनेच्या रस्त्यावरील कोणत्या आंदोलनात भाग घेतला? आणि त्यामुळे त्यांना विधान परिषद दिली याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे. त्यांना मिळालेला हा धडा हा नियतीचा सूड आहे हे उद्धव ठाकरे यांनी विसरू नये.

चार पक्ष फिरून आलेल्या नीलम ताईंना उद्धव ठाकरे यांनी चार वेळा विधानपरिषद दिली. गेल्यावेळी त्यांना विधान परिषदेचे उपसभापती पदही दिले. या पदाला कॅबिनेट दर्जा असल्याने हे पद पुन्हा आपल्याकडेच राहावे म्हणून त्यांनी रंग बदलले. लगेचच त्या एकनाथ शिंदे यांच्या सेनेत गेल्या नाहीत मात्र महायुतीचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढल्यानंतर लगेचच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांचे उप सभापतीपद कायम राहिले अन्यथा त्यांना हे पद सोडावे लागले असते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या शिफारसीने भाजपमधून आलेल्या प्रा. मनीषा कायंदे यांना शिवसेनेत येताच लगेच विधान परिषदेवर पाठवण्यात आले. मात्र त्याही शिंदे सेनेत दाखल झाल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळालेले धडे हे चांगलेच आहेत.
नीलम ताईंचे आरोपात तथ्य नाही परंतु पक्ष चालवण्यासाठी पार्टी फंड हा लागतोच. नारायण राणे ते एकनाथ शिंदे हे काही कर्तुत्वावर मोठे झालेले नेते नाहीत. नारायण राणे यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष असताना, महसूल मंत्री झाल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यावर सर्वाधिक पक्षनिधी दिला त्यामुळेच ते सर्वांना डावलून मोठे झाले. 1990 पासून आमदार आणि नेते असलेल्यांना डावलून 2004 साली निवडून आलेले एकनाथ शिंदे हे केवळ पक्ष निधीच्या जीवावरच मोठे झाले. त्यांची राजकीय क्षमता ही त्यांच्या वक्तृत्वावरून लक्षात येते.

परंतु उद्धव ठाकरे यांना हे नियतीने दिलेले धडे आहेत. पक्षासाठी आणि संघटनेसाठी राबणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना मातोश्री बाहेर ठेवून तिष्ठत ठेवून केवळ पक्ष निधी देणाऱ्या कालच्या नेत्यांना मातोश्री मध्ये महत्व आले. परंतु सर्वाधिक पक्ष निधी देणारे नेते पक्षाबाहेर सर्वांच्या अगोदर गेले हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ६४ व्या वाढदिवस ६४ॲम्बुलन्स देणारे गणेश नाईक हे सुद्धा पक्षाबाहेर गेले. सर्व निवडणुकांचा सर्वाधिक खर्च सांभाळणारे नारायण राणे हे सुद्धा पक्षाबाहेर गेले. ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्रातून सर्वाधिक पक्षनिधी देणारे एकनाथ शिंदे हे सुद्धा पक्षाबाहेर गेले.

नितीन सावंत, ९८९२५१४१२४

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech