जालना : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षांना आज पासून सुरुवात झाली.परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी व्हिडिओ शुटिंग, पोलिस गस्ती पथक, बैठे पथक आदी यंत्रणा कार्यरत आहे. असे असतानाही पेपरच्या पहिल्याच दिवशी जालन्यातली बदनापुरमध्ये दहावी बोर्डाची प्रश्न पत्रिक फुटली आहे. लोकांनी त्याची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवली आहे. बदनापूर येथील परीक्षेच्या ठिकाणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आजपासून (२१ फेब्रुवारी )राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली. आज मराठीचा पेपर होता. पण जालन्यात पहिल्याच दिवशी दहावीच्या परीक्षेला पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. जालन्यामध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत मराठीचा पेपर फुटला. शहरातील झेरॉक्स सेंटरवर अवघ्या २० रूपयांत प्रश्न पत्रिकेची झेरॉक्स मिळत होती.
त्यासह मंठा तालुक्यातील तळणी परीक्षा केंद्रांवरही गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा समोर आल्याने तातडीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रांवर शिक्षणाधिकारी यांना पाठवले. परीक्षा केंद्रांवर तपासणी सुरू असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आले. जालन्यामध्ये पेपर फुटल्यानंतर बदनापूर बोर्डातून दहावाची प्रश्न पत्रिका बाहेर आलीच कशी? अशी चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर प्रवीण दरेकर यांनी कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. एकीकडे पेपर फुटल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे जालन्यातील जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हणलं आहे की, पेपर फुटल्याच्या बातमीत काहीच तथ्य नाही. समाज माध्यमावर जो पेपर व्हायरल झाला होता तो वेगळा पेपर आहे. व्हाट्सअप वरती जे सर्क्युलेट झालं होतं ते उत्तर पत्रिकेचा भाग नाही. अशा पद्धतीची कोणतीही घटना घडली नाही. एका पालकांनी तिथे दगड फेकला होता त्यावर कारवाई केली जाणार. सर्व केंद्रावर कडक बंदोबस्त आहे.