जळगाव : बळीराजाचे हित हेच महायुती सरकारचे उद्दीष्ट असून शेतकरी हिताला प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा निर्माण करणाऱ्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा इतिहास दैदिप्यमान आहे. गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. या संस्थेसाठी सर्वोतोपरी मदत निश्चित केली जाईल. शेंदुर्णी शहराच्या विकासासाठी तसेच प्रलंबित सर्व प्रश्न, मागणी केलेल्या सर्व गोष्टी, विकास निधी व शेतकऱ्यांना सर्व मदत करण्यासाठी आपलं जनतेचे सरकार सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
शेंदुर्णी येथील धी. शेंदुर्णी सेकं. एज्युकेशन को. ऑप. सोसायटी लि. शेंदुर्णी या संस्थेच्या अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन व शेतकरी मेळावा, नुतन इमारतीचा पाया भरणी समारंभ तसेच नगरपंचायत शेंदुर्णीच्या नगरोत्थान महाभियानांतर्गत रस्ते विकास प्रकल्प भुमिपुजन व कोनशिला अनावरण आदी कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या महिला वस्तीगृह प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन हे होते.
प्रास्ताविक शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी संस्थेच्या स्थापनेचा इतिहास, गोरगरिबांच्या मुला मुलींसाठी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असुन हजारो विद्यार्थी आज जागतिक पातळीवर संस्थेचे नाव उज्ज्वल करत असल्याचे सांगितले, संस्था चालवत असताना येणाऱ्या समस्या निवारण होऊन शहरातील विविध प्रलंबित असलेल्या मागण्या पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली व सर्व मान्यवरांचे स्वागत केले.