अमरावती : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बालविवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. बालविवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, तसेच बालवधूचे स्वागत करणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मागील सहा वर्षात प्रशासनाने ३ हजार ९५४ बालविवाह रोखले आहेत. गेल्या वर्षभरात महिला व बालविकास विभागाने १८ बालविवाह थांबवले आहेत. यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम १६ (१) नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. बालविवाह रोखण्यासाठी गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम, बैठका, रॅली आणि माहितीपत्रके वाटप करण्यात येत आहे. बालविवाहात सहभागी होणारे धार्मिक गुरु, पंडित, सेवा देणारे, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कायदेशीर येईल. कारवाई करण्यात.
अमरावती जिल्हा ३ जानेवारी २०२३ पासून बालविवाह मुक्त घोषित करण्यात आला आहे. नागरिकांनी बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०९८ किंवा ११२ यावर माहिती द्यावी, नागरिकांनी सतर्क राहून बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.