रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील एका तरुणाने रायगडमधील मच्छिमारांची दीड कोटी रुपयांची फसवणूक केली असून त्या संशयिताला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. नायब मजिद सोलकर (रा.नाटे, ता.राजापूर, जि. रत्नागिरी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. नायब सोलकर याने ९ सप्टेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत अलिबाग येथील लक्ष्मण सारंग, रणजित भगवान खमीस, प्रदोश गोरखनाथ तांडेल, विशाल हरिश्चंद्र बना (रा. अलिबाग कोळीवाडा) यांच्याकडून मासळीची खरेदी केली होती. त्या बदल्यात या सर्व व्यापाऱ्यांना नायब सोलकर १ कोटी ५२ लाख रुपये देणे होते. मात्र वारंवार मागणी करूनही नायब सोलकरने अलिबागच्या मच्छीमारांना पैसे दिले नाहीत.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या मच्छीमारांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे ५ महिन्यांपासून आरोपी त्याचा मोबाइल बंद ठेवून फरार झाला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी, विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी करीत होते.सूर्यवंशी यांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करून माहिती मिळविली. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी आरोपी नायब मुंबईतून त्नागिरीला जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्याच्या कारचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. नायब मजिद सोलकर याची चौकशी करून त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.