कोल्हापूर : कोल्हापुरातील आयटी पार्क साठी ज्या दिवशी जागा निश्चिती होईल, त्याच दिवशी आयटी पार्कचा शासन निर्णय काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच युवकांना रोजगार निर्मिती करुन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकांबरोबरच यापुढे सहकारी बँकांमधूनही कर्जपुरवठा ग्राह्य धरण्यात येण्याबाबतचा शासन निर्णय येत्या पंधरा दिवसात काढण्यात येईल. त्याचबरोबर भविष्यात अधिकाधिक दर्जेदार उद्योग प्रकल्प कोल्हापुरात उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्ह्याची औद्योगिक प्रगती व रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद-२०२५ हॉटेल दि फर्न येथे उद्योग मंत्री श्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष तथा नंबर वन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उद्योग आणि कृषी चे अध्यक्ष ललित गांधी व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उद्योग परिषदेला माजी आमदार सुजित मिणचेकर, पुणे विभागाचे सह संचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामंजस्य कराराचे आदान प्रदान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उद्दिष्ट पूर्ती व उल्लेखनीय काम केलेल्या विविध बँकर्सना मंत्री श्री सामंत व पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आजच्या गुंतवणूक परिषद कार्यक्रमात १४७ उद्योग घटकांचे ४ हजार १६० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, उद्योग क्षेत्रावर ८० ते ८५ टक्के गुंतवणूक करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. उद्योग क्षेत्रात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून ४ हजार कोटींचे करार करण्यात यशस्वी झाले आहे. राज्यात मेगा व अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणले आहेत. मागील वर्षा पेक्षा तिप्पट गुंतवणूक उद्योगक्षेत्रात वाढत आहे. यावरूनच उद्योजकांचा उद्योग क्षेत्रावर असणारा विश्वास लक्षात येतो.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पहिल्या वर्षी १२ हजार दुसऱ्या वर्षी १२ हजार तर तिसऱ्या वर्षी २३ हजार उद्योजक म्हणजे जवळपास ४० हजार उद्योजक या कार्यक्रमातून तयार झाले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक उद्योजक तयार करण्यात शासनाला यश आले आहे. या योजनेमध्ये कोल्हापूर जिल्हा प्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याने उद्योग निर्मितीसाठी युवक युवतींना कर्ज पुरवठा करुन या योजनेची उद्दिष्टपूर्ती केल्यास राज्यात लाखो उद्योजक तयार होतील. यासाठी दर्जेदार कार्यशाळांचे आयोजन करावे, असे सांगून कोणताही उद्योग उभारताना उद्योजकांनी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोणतीही योजना यशस्वी होण्यात त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असते. कोल्हापूर जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक काम झाल्याबद्दल मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कामाचे कौतुक केले. खादी ग्रामोद्योग विभागामार्गत शुद्ध मध निर्मितीला चालना दिली जात असून या माध्यमातून मध उत्पादक शेतकऱ्यांना दरमहा किमान १५ हजार रुपये उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.