भारताच्या युवा शक्तीची ताकद भारताला विकसित राष्ट्र बनवेल : पंतप्रधान

0

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे विकसित भारत युवा नेते संवाद २०२५ या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात भारतभरातील ३,००० उत्साही तरुण नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी भारतीय युवकांवर आपला प्रचंड विश्वास असून या विश्वासातूनच माय भारतच्या निर्मितीला प्रेरणा दिली आणि विकसित भारत युवा नेते संवादाची पायाभरणी केली आहे. भारतातील तरुणांची क्षमता लवकरच भारताला विकसित राष्ट्र बनवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय मोठे असले तरीही ते अशक्य नाही, असे सांगून नकार घंटा वाजवणाऱ्यांचे मत त्यांनी खोडून काढले. कोट्यवधी तरुणांच्या सामूहिक प्रयत्नांनी प्रगतीची चाके फिरली की राष्ट्र निश्चितपणे आपले लक्ष्य गाठेल, असे ते म्हणाले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील तरुणांच्या चैतन्यपूर्ण उर्जेने भारत मंडपममध्ये आणलेले सळसळते चैतन्य अधोरेखित केले. देशातील तरुणांवर अपार विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण देश स्मरण करत आहे आणि त्यांना आदरांजली वाहतो आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की तरुण पिढीतून येणारे त्यांचे शिष्य, सिंहांप्रमाणे निधड्या छातीने प्रत्येक समस्येचा सामना करतील, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे स्वामीजींनी तरुणांवर विश्वास ठेवला त्याचप्रमाणे स्वामीजींवर माझी पूर्ण स्वामीजींवर, विशेषत: तरुणांबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर पूर्ण श्रद्धा आहे, असेही ते म्हणाले. आज जर स्वामी विवेकानंद आपल्यामध्ये असते तर २१ व्या शतकातील तरुणांची जागृत शक्ती आणि सक्रिय प्रयत्न पाहून ते नव्या आत्मविश्वासाने भारले असते, असेही पंतप्रधान यावेळी बोलतांना म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-२० कार्यक्रमात जगाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी अनेक जागतिक नेते एकाच ठिकाणी जमले होते, तर आज देशातील तरुण भारताच्या पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी एकत्र जमले आहेत. काही महिन्यांपूर्वी आपल्या निवासस्थानी तरुण खेळाडूंना भेटल्याचा एक किस्सा सांगताना पंतप्रधानांनी एका क्रीडापटूने “जगासाठी, तुम्ही कदाचित पंतप्रधान असाल, परंतु आमच्यासाठी तुम्ही परम मित्र आहात” असे म्हटल्याचे अधोरेखित केले. मैत्रीतील सर्वात मजबूत दुवा विश्वास आहे असे सांगून पंतप्रधानांनी भारतातील तरुणांसोबतच्या मैत्री संबंधावर भर दिला.

“इतिहास आपल्याला शिकवतो आणि प्रेरणा देतो”, असे मोदी म्हणाले आणि राष्ट्रे तसेच गटांनी, मोठी स्वप्ने आणि संकल्पांसह त्यांचे ध्येय साध्य केल्याची अनेक जागतिक उदाहरणे अधोरेखित केली. अमेरिकेतील १९३० च्या आर्थिक संकटाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की अमेरिकी नागरिकांनी नवीन करार निवडला आणि केवळ संकटावर मात केली एव्हढेच नव्हे तर त्यांच्या विकासालाही गती दिली. त्यांनी सिंगापूरचाही उल्लेख केला, ज्याने जीवनातील मूलभूत संकटांचा सामना केला. मात्र, शिस्त आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे त्यांचे जागतिक आर्थिक आणि व्यापार केंद्रात रूपांतरण झाले. भारताकडेही यासारखीच उदाहरणे असून स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्यानंतरच्या अन्न संकटावर मात केली याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. मोठी उद्दिष्टे निश्चित करणे आणि ती एका कालमर्यादेत साध्य करणे अशक्य नसल्याचे त्यांनी भर सांगितले. ध्येय स्पष्ट असल्याशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही आणि आजचा भारत याच मानसिकतेने काम करत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech