भुवनेश्वर : भारत वि इंग्लंड वनडे मालिका भारतात उद्यापासून (६ फेब्रुवारी) खेळवली जाणार आहे. कटक, ओडिशातील बाराबती स्टेडियमबाहेर मंगळवारी रात्रीपासूनच क्रिकेट चाहत्यांनी गोंधळ घातला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे ऑफलाइन तिकीट काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून गर्दी झपाट्याने उफाळून आली. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये तर दुसरा सामना कटकमध्ये खेळवला जाणार आहे. कटकमध्ये खेळवला जाणारा सामना पाहण्यासाठी कटक स्टेडियमबाहेर ऑफलाइन तिकिट खरेदीसाठी हजारो चाहत्यांची गर्दी जमली होती. यामुळे चेंजराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांना भोवळ आल्याची तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
तिकीट उपलब्ध असल्याची माहिती पसरताच, परिस्थिती आणखी बिघडली. काही लोक गर्दीच्या तिकीट काउंटरमध्ये धडपड करत होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.या सर्व प्रकारामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रचंड गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जसह पाण्याच्या तोफांचा अवलंब करावा लागला.या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांना भोवळ आली तर काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.
स्थानिकांनी कटक येथील प्रशासनावर चुकीचे नियोजन आणि अपुऱ्या सुविधांमुळे अशी घटना घडल्याचा आरोप केला. निराश चाहत्यांनी पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि जाण्यायेण्याचा योग्य मार्ग तयार केले नसल्याची टीका केली, ज्यामुळे तणाव वाढल्याने परिस्थिती आणखी वाईट झाली.तिकीट विक्री नीट न झाल्याने अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांनी ओडिशा क्रिकेट असोसिएशनवर टीका केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना अनेक वर्षांनंतर कटकमध्ये खेळवला जाणार आहे. बाराबती स्टेडियमवरील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामना होता. त्याचवेळी, विराट कोहली आणि रोहित शर्मा बाराबती स्टेडियमवर खेळण्याची ही गेल्या पाच वर्षांतील पहिलीच वेळ आहे. या दोन स्टार खेळाडूंनी शेवटचा एकदिवसीय सामना २०१९ मध्ये कटक येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता, जेव्हा कोहलीला भारताच्या विजयाचा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.